विंदाचे काव्यसंग्रह जीवनाला दिशा देणारे   

जयश्री काळे यांचे प्रतिपादन 

पुणे : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या कविता प्रेम, संयम आणि आत्मसन्मान शिकवतात. त्यांच्या काव्यसंग्रहात वास्तवता आणि कल्पना यावर आधारित लिखाणांचे अनेक पैलू दडलेले आहेत. त्यामुळे विंदाचे काव्यसंग्रह मानवी जीवनाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन विंदाच्या कन्या जयश्री काळे यांनी बुधवारी केले. 
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ’वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रातील पूनमचंद सुराणा स्मृती व्याख्यानात ’विंदादर्शन’ या विषयावर काळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, विंदा करंदीकर यांना बालपणापासूनच कविता करण्याची आवड निर्माण झाली. त्यांनी बालवयातच ’कसा मी कळेना’ ही कविता लिहिली. ’राणीची बाग’ या कवितेतून कल्पना आणि वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांना आवडणार्‍या अनेक कविता विंदानी लिहिल्या आहेत. त्यामध्ये ’परी आणि दगड’ ही कविता लहान मुलांचे ताईतच बनले. विंदानी ’बाळ होऊनी कुशीत यावे’ यामधून मित्रत्वाचे नाते घट्ट केले. त्यामुळे त्यांच्या काव्यसंग्रहात मित्रत्वाच्या नात्याला अधिक महत्व प्राप्त झाल्याचे दिसून येते, असेही काळे यांनी नमूद केले. 
 
काळे म्हणाल्या, विंदाचे संपूर्ण आयुष्यच संघर्षात गेले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांना कर्करोग झाला. परंतू, त्यांनी कधीच त्याचा बाऊ केला नाही. त्या काळातही त्यांचे लिखान सुरूच होते. त्यांनी शोषीत स्त्रीयांचे प्रश्न कवितेतून मांडले. तसेच ’झप्ताली’ सारख्या कवितेतून गृहिणींना बळ देण्याचे कार्य विंदाच्या लेखनीने केले. विंदा हे पुरूषप्रधान व्यवस्थेबद्दल अवस्थ होते. ’कर कर करा, मर मर मरा’ या कवितेतून त्यांनी समाजातील पुरूष वर्चस्वाचे वास्तव मांडले. विंदानी ही कविता सातारा येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात सादर केली. या कवितेला साहित्य रसिकांनी दाद देत कवितेचा स्विकार केला, असे काळे यांनी सांगितले.
 
विंदा करंदीकर यांना निवडणुकीचे आर्कषण होते.’सब टक्के बारा घोडे’ या कवितेतून त्यांनी राजकारणाचा सामान्य नागरिकांवर कसा प्रभाव पडतो, याचा उलगडा केला. तसेच त्यांनी ’ती जनता अमर आहे’ यामधून जनतेच्या हातामध्ये उद्याच्या भविष्याची भेट आहे, याची जाणीव करून दिली. त्यांचे मोठेपण अनेक सामाजिक कार्यातून दिसून आले आहे. वडिलोपार्जीत मिळालेली दोन एकर जमीन त्यांनी एका शाळेला दान केली. तरूणांना नोकर्‍या मिळत नाही म्हणून त्यांनी ५२ व्या वर्षीच आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्या जागी दुसर्‍याला नोकरीची संधी उपलब्ध करून दिली, असेही त्या म्हणाल्या. वसंत व्याख्यानमालेच्या उपाध्यक्षा सरीता साठे यांनी जयश्री काळे यांचा सत्कार केला. डॉ. महेश रधंवे यांनी सूत्रसंचालन केले.
 

Related Articles